कोण होत्या सावित्रीमाई

सावित्रीमाई कोण होत्या? ================ सावित्रीमाई फुले यांचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील क्रांतिकारक योगदान:- • मुलींसाठी व अस्पृश्यांसाठी शाळा चालू करणारे पहिले भारतीय फुले दाम्पत्य होय. याप्रकारे त्यांनी शिक्षणात नवे पर्व सुरु केले. • मुलींच्या शाळांच्या पहिल्या भारतीय शिक्षिका आणि मुख्याध्यापिका. • शाळांसाठी अभ्यासक्रम नियोजन (curriculum planning) करणाऱ्या, व अभ्यासक्रम तयार करून राबविणाऱ्या पहिल्या शिक्षणतज्ञ. “अभ्यासक्रम नियोजन” हा विषय आज शिक्षणशास्त्राच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात शिकवला जातो. • सर्व शैक्षणिक कार्य विनामूल्य करणाऱ्या पहिल्या अध्यापिका. • शिक्षणामध्ये शारीरिक शिक्षणाचा अंतर्भाव करणाऱ्या पहिल्या अध्यापिका. • शाळेत कथाकथनाची खास तासिका ठेवणाऱ्या व आनंददायी शिक्षणाच्या पहिल्या प्रवर्तक. राज्य सरकारने “आनंददायी शिक्षण” ही योजना अलीकडे राबवण्यास घेतली आहे. • त्यांनी बहुजनांसाठी देशातील पहिली “नेटिव्ह लायब्ररी” काढली होती. • त्यांनी पहिले अध्यापक प्रशिक्षण केद्र “नॉर्मल स्कूल” काढले व चालवले होते. • त्यातून “फातिमा शेख” ही पहिली मुस्लीम शिक्षिका तयार करण्याचे श्रेयसुद्धा सावित्रीबाई व जोतिबा यांना जाते. • पुणे व आजूबाजूंच्या १८ शाळांचे संचालन करणाऱ्या पहिल्या संचालिका. • विद्यार्थ्यांना गणवेश पुरविणाऱ्या पहिल्या संचालिका. • सह-शिक्षणाचा पुरस्कार करणाऱ्या पहिल्या शिक्षण-तज्ञ. त्यासाठी वेताळ-पेठेत सह-शिक्षण देणारी शाळा काढली. पण विवाहित महिलांनी मुलांसोबत बसण्यास नकार दिल्याने मुलांची व मुलींची अशा दोन शाळा केल्या. • शालेय विद्यार्थ्याना शिक्षण घेता यावे यासाठी त्यांना विद्यावेतन (स्कॉलरशिप) देणे सुरु करणाऱ्या पहिल्या अध्यापिका. • गरीब घरांतील मुले शाळेत यावीत म्हणून त्यांना खायला देण्याचा उपक्रम राबविणाऱ्या पहिल्या अध्यापिका. सरकार अलीकडे हा उपक्रम राबवीत आहे. • प्राथमिक स्तरापासून इंग्रजीचा पुरस्कार करणाऱ्या व राबविणाऱ्या पहिल्या अध्यापिका. • विद्यार्थ्यांचे शिक्षण, त्याचे महत्त्व, विद्यार्थ्यांच्या समस्या याविषयी पालकांचे समुपदेशन करणाऱ्या पहिल्या समुपदेशक. विकसित देशांत शाळाशाळांत समुपदेशक असणे आवश्यक आहे. • सरकार तर्फे आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळालेल्या पहिल्या भारतीय अध्यापिका. • विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी घरी विनामूल्य वसतिगृह चालवणारे पहिले दाम्पत्य. • विधवा स्त्रियांसाठी वसतिगृह काढणारे पहिले दाम्पत्य. • फुले दाम्पत्त्याने सर्वप्रथम प्रौढांसाठी प्रशिक्षण वर्ग काढले होते. शेतकरी, कामकरी यांच्यासाठी त्यांनी रात्रशाळा काढल्या होत्या. • सावित्रीबाई व जोतीराव यांनी आपल्या शाळेत शिकलेल्या धुराजी आप्पाजी चांभार व रानबा महार यांना शिक्षक बनवले होते. याप्रकारे भारतात दलित व्यक्तीना सर्वप्रथम शिक्षक बनविण्याचा मान फुले दाम्पत्यांना मिळतो. • मारेकरी म्हणून आलेल्या धोंडीराम नामदेव कुंभार याला ब्राह्मणेतरातील पहिला पंडित बनविण्याचा मान फुले दांपत्याकडे जातो. • आधुनिक, वैज्ञानिक, मानवतावादी व धर्मनिरपेक्ष शिक्षणाच्या पहिल्या पुरस्कर्त्या. • आधुनिक काव्याच्या जनक. (केशवसुतांच्या सुमारे ४० वर्षे आधी आधुनिक शैलीत व पंतकाव्य व संतकाव्य यापेक्षा वेगळ्या आणि जनसामन्यांच्या विविध विषयांवर कवितांचे लेखन.) ‘काव्यफुले’ व ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. • खादीचा पुरस्कार व प्रसार करणाऱ्या पहिल्या सामाजिक नेता. • अस्पृश्यांना स्वत:च्या घरची पाण्याची विहीर व हौद खुला करून देणारे पहिलेच दाम्पत्य. • वाट चुकलेल्या विधवांच्या प्रसूतीसाठी व आधारासाठी “बालहत्या-प्रतिबंधक-गृह” सुरु करून चालवले. फसलेल्या वा बलात्काराने गरोदर राहिलेल्या विधवांचे त्या बाळंतपण करत. भारतातील हा असा पहिलाच प्रयोग होता. • फुले दाम्पत्याने अनाथ व अवैध संतती म्हणून जन्माला आलेल्या मुलांसाठी अनाथाश्रम काढले होते. हा भारतीयांचा अशा प्रकारचा पहिला अनाथाश्रम होता. त्यांच्या मातांसाठी सुद्धा वसतिगृह काढले होते. • विधवा पुनर्विवाह सभेचे आयोजन व संघटन करणाऱ्या पहिल्या सुधारक. • विधवा ब्राह्मण स्त्रीचा अनौरस मुलगा दत्तक घेतला. परक्या जातीतील मुलास दत्तक घेणाऱ्या पहिल्या भारतीय महिला. • आंतरजातीय विवाहाचा पुरस्कार करणारी समाज सुधारक. स्वत:च्या दत्तक मुलाचा सुद्धा आंतरजातीय विवाह करून दिला होता. • हुंडाविरहित सामुहिक विवाहाच्या प्रवर्तक. • रोटीबंदीच्या काळात सर्व जातीय महिलांचे तीळ-गुळासारखे मोठमोठे मेळावे घेणाऱ्या पहिल्या जाती-निर्मूलक. • मराठीतील पहिली पुस्तक संपादिका आणि प्रकाशिका. महात्मा फुले यांची भाषणे टिपणे काढून संपादित करून प्रकाशित केली. • विधवांच्या केशवपन (टक्कल करणे) विरोधात न्हाव्यांचा यशस्वी संप घडवून आणला. हा भारतातील पहिला यशस्वी संप होता. • त्या प्रभावी वक्ता होत्या. सत्यशोधक समाजाच्या व इतर कार्यक्रमांत त्यांनी बरीच भाषणे दिली होती. • पतीच्या अंत्ययात्रेत स्वत: टिटवे घेऊन जाणाऱ्या पहिल्या भारतीय महिला. • पतीच्या चितेला अग्नी देऊन सर्व अंत्यसंस्कार करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला. • सत्याशोधक समाजाच्या पहिल्या महिला अध्यक्ष. • १८९६ साली दुष्काळात पोटासाठी शरीरविक्रय करणार्याय बायांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून सावित्रीबाईंनी त्यांना सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले. • १८९६ साली दुष्काळात सरकार दरबारी गाऱ्हाणे मांडून दुष्काळग्रस्तांसाठी रोजगार हमीसारखी दुष्काळी कामे सरकाराला सुरु करण्यास भाग पाडले. • १८७६ च्या दुष्काळात उपासमार झेलणाऱ्या हजारो मुलांसाठी मातृप्रेमाने ५२ अन्नछत्रे चालवणारी एकमेव माता. १८९६ च्या दुष्काळातही अशी अन्नछत्रे चालविली. • बहुजनांची चळवळ चालविणाऱ्या पहिल्या महिला पुढारी. • भारतीय महिला मुक्ती व महिला सबलीकरण आंदोलनाच्या पहिल्या नेत्या. संदर्भ:- “सावित्रीमाई कोण होत्या?” -धनंजय आदित्य

Comments

Popular posts from this blog

डॅा बाबासाहेब आंबेडकरांचे संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील योगदान उपेक्षित का ?

बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड

शाक्त राज्याभिषेक